वेळेवर उपस्थित न राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई : विद्या प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बजाविला आदेश
पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (विद्या प्राधिकरण) अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात नियमितपणे वेळेवर उपस्थित राहण्याबाबतचा आदेश बजाविण्यात आलेला आहे. याची अंमलबजावणी न केल्यास शिस्तभगांची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
काही अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयात कधीच वेळेवर येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही जण कधीही येतात हजेरी लावतात अन् बैठकांचेनिमित्त सांगून आपली स्वत:ची कामे मार्गी लावण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडतात. यामुळे कार्यालये ओस पडल्याचे चित्र अनेकदा पहायला मिळते. आता या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी सुरुवात झालेली आहे.
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे विद्या प्राधिकरणाच्या प्रभारी संचालकपदाची सूत्रे सोपविण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांच्याकडे शिक्षण सहसंचालकपदाचा तर शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधीक्षक श्रीधर शिंत्रे यांच्याकडे प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. या तीनही प्रभारी अधिकाऱ्यांनी विद्या प्राधिकरणाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेऊन त्यांना कामकाज पद्धतीत योग्य त्या सुधारणा करण्याबाबत तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कडक शब्दांत समज देण्यात आलेली आहे. वारंवार सूचना देऊनही त्याचे काही जण पालन करत नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यावर अखेर लेखी फतवाच काढण्यात आलेला आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर हजर राहावे; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.
हा नियम वर्ग 1 ते 4 मधील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेला आहे. इमारतीच्या नूतनीकरणाचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक प्रणालीद्वारे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदवावी लागणार आहे, अशी माहिती वरिष्ठ प्रभारी अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.