भोपाळ – मध्य प्रदेशातही ऑक्सिजनअभावी 5 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ती घटना गुरुवारची मध्यरात्र उलटल्यानंतर जबलपूरमधील एका खासगी रुग्णालयात घडली. त्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) काही करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
दुर्दैवाने, ऑक्सिजन साठा संपल्याने त्यातील पाच रुग्णांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयाने ऑक्सिजनचे 10 सिलिंडर मागवले होते. मात्र, त्या सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनात बिघाड निर्माण झाला. त्यातून सिलिंडर वेळेत पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, भाजपचे स्थानिक आमदार अजय विष्णोई यांनी संबंधित घटनेचा ठपका रुग्णालयाच्या गैरव्यवस्थापनावर ठेवला. ऑक्सिजनची गरज ओळखून रुग्णालयाने आधीच ऑक्सिजन पुरवठ्याची निश्चिती करायला हवी होती, असे ते म्हणाले.