जुन्नरच्या मांजरवाडी परिसरातील स्थिती : बळीराजाच्या हातचे पीक गेले
खोडद – मांजरवाडी (ता. जुन्नर) परिसरात मका पिकाच्या शेंड्यावर अळी व किडे आल्यामुळे पीक हातचे जात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
उष्णतेचा चढता पारा, विहिरी, तलावांनी गाठलेला तळ, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न यामुळे 1972 च्या दुष्काळापेक्षाही गंभीर परिस्थिती जुन्नर तालुक्यात निर्माण झाली असताना आता मका पिकावर शेंड अळीमुळे शेतकऱ्यांवर नवीन संकट ओढवले आहे. दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यावाचून शेत जमिनी ओस पडलेल्या आहे. पूर्व भागातील व आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे छावण्यांमध्ये ठेवली आहेत. काही भागात अल्प प्रमाणात पाणीसाठा आहे ते शेतकरी पालेभाज्या किंवा इतर नगदी उत्पादन घेण्याऐवजी जनावरांचे खाद्य पिकवण्याकडे लक्ष केंद्रीत करत आहेत; परंतु त्यातही आता पारा 43 अंशापर्यंत गेल्यामुळे पिकांवर व जनावरांच्या किंवा शेळ्या मेंढ्यांच्या चारा पिकावर नव-नवीन रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. दुभत्या जनावरांचे महत्त्वाचे खाद्य असणाऱ्या मका पिकावर तर शेंडे अळींनी आक्रमणच केले आहे.
मक्याचे पीक उगवून आल्यानंतर लगेच शेंड्यांना लागलेली ही अळी शेंडापासून खोडापर्यंत पीक पूर्णपणे पोखरत आहे, त्यामुळे मक्याच्या झाडाची वाढ खुंटल्याने हे पीक शेतकऱ्याला सोडून द्यावे लागत आहे. एकूण पिकच्या 60 ते 70 टक्के पिकाला अळी लागल्यामुळे मांजरवाडी परिसरातील भागात जनावरांच्या चारा टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. या अळीसाठी पिकावर रोगार क्लोरो, लिऑन ही कीटकनाशके फवारली तरी शेंडे अळी जात नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.