अकोला – मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे असा सल्ला आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड .प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. राज्यात करोनाची दुसरी लाट मंदावत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया करण्यात आली आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘अनलाॅक’ जाहीर केले. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यात लॉकडाऊन कायम असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढले. या गोंधळामुळे महाविकास आघाडी सरकारवर आंबेडकर यांनी हल्लाबोल केला आहे.
एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं असा सल्ला देत एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला हा मोलाचा सल्ला दिला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी अनलाॅकचा निर्णय जाहीर केला तर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्र्याचा निर्णय बदल करुन लागू केला तर मंत्र्याचा अपमान आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाने राजीनामा दिला पाहीजे, असा सल्ला देखिल अॅड. आंबेडकर यांनी दिला आहे.
राज्यातील १८ जिल्हे पूर्णत: अनलाॅक करण्यात आले असून, तेथील सर्व व्यवहार सुरळीत होतील, पाच स्तरावर अनलाॅकची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची घोषणा मदत व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली. परंतू तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते.