अमरावती – आठ वर्षांपूर्वी घडलेल्या पोलीस मारहाण प्रकरणात अमरावती न्यायालयाने आज महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा व १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. अमरावतीतील अंबादेवी मंदिराजवळ घडलेल्या या घटनेत ठाकूर यांना उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली होती.
या मारहाण प्रकरणात ठाकूर यांच्यासोबतच त्यांच्या वाहनचालक व दोन कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने याबाबत सुनावणी करताना यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांचा वाहनचालक व दोन कार्यकर्त्यांना दोषी ठरवले. या प्रकरणात फितूर होऊन साक्ष देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांचा कार चालक आणि सोबत दोन कार्यकर्तेही दोषी आढळले आहेत. दरम्यान यशोमती ठाकूर यांना या प्रकरणी शिक्षा सुनावली जाताच भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी, ‘न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदरच केला आहे. मी स्वतः वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर भाष्य करणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. शेवटी सत्याचा विजय होईल’ असं म्हटलं.
राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला सुनावलं
भाजपने राजीनाम्याची मागणी केल्याबाबत प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर यांनी, “एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजपा लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजपासोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. पण मी माघार घेणार नाही. भाजपाशी माझी लढाई सुरूच राहील.”