नीरा नदीवरील पूल पाण्याखाली
भाटघर – भोर तालुक्यातील नीरादेवघर व भाटघर ही धरणे शंभर टक्के भरल्याने अतिवेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे भोर-कापूरहोळ रस्त्यावरील नीरा नदीवर बांधण्यात आलेले दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तीन दिवस पाणी पुलावरून अतिवेगाने वाहत असल्यामुळे पुलावरील काही ठिकाणचा डांबराचा भाग वाहून गेला आहे. यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे.
सद्य स्थितीत पुलावरून वाहणारे पाणी कमी झाले असले तरी नागरिकांच्या सुरक्षेससाठी प्रशासनाने वाहतूक बंद केली आहे. यामुळे रस्त्यावर रविवारी सायंकाळी सहानंतर ते गुरुवारपर्यत (दि. 8) शुकशुकाट दिसत होता. भोरकडून पुण्याकडे ये-जा करण्यासाठी सदर रस्त्याचा उपयोग केला जातो. तसेच पुण्याहून महाडकडे जाताना याच रस्त्याचा अवलंब केला जातो. भोरकडे येताना नेकलेस पॉईंट, भाटघर धरण, नीरा देवघर धरण, रोहिडेश्वर किल्ला, रायरेश्वर पठार, आंबवडे येथील लाकडी झुलता पूल, भोरचा राजवाडा अशा विविध ठिकाणी पर्यटक येत असतात. सरकारी सुटी व रविवारी भोरच्या दिशेकडे गर्दी पाहायला मिळते. याठिकाणी येण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग होत असल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
संगमनेर परिसरातील तरुण वर्ग नोकरीसाठी शिरवळ एमआयडीसी येथे जात असून सदर रस्ता बंद असल्याने कापूरहोळ मार्गे लांब पल्ल्याने जावे लागत आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल व्यवसायावर परिणाम झालेला दिसून येत आहे तर काही हॉटेल मालकांनी हॉटेल बंद ठेवलेली आहेत. ऐरवी भोरमधील बाजारपेठ गजबजलेली दिसून येते, परंतु सदर रस्ता बंद असल्याने बाजारपेठेत देखील शुकशुकाट दिसून आला.