जलपर्णी काढल्याने घेतला मोकळा श्वास ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य
राजगुरूनगर-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राजगुरुनगर येथील भीमा नदीमध्ये विविध संस्था, पर्यावरण प्रेमी यांच्या वतीने जलपर्णी निर्मूलन मोहीम सुरु करण्यात आली. याअंतर्गत भीमानदी स्वच्छ करण्यात आली. या उपक्रमात शहरातील 700 ते 800 जण सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या मोठी होती.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू पुलाचा भीमा नदीपात्रात स्वयंसेवकांच्या वतीने जलपर्णी काढून भीमा नदीची स्वच्छता करण्यात आली. राजगुरुनगर नगर परिषदेने यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार स्वयंस्फूर्तीने अनेकजण या उपक्रमात सहभागी झाले होते. राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने एक पोकलॅण्ड, दोन जेसीबी, दहा ते 12 ट्रॅक्टर लावण्यात आले होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने शहरातील नागरिकांनी हा आगळा वेगळा उपक्रम राबविला होता. चैतन्य सामाजिक संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब, हुतात्मा राजगुरू सोशल फौंडेशन, स्व. बाळासाहेब आपटे यूपीएससी अकादमी, गगन भरारी अकादमी, स्वामी विवेकानंद अकादमी, भारत निर्माण संस्था, आर्यन साई ग्रुप, ढुम्या डोंगर गिरी भ्रमणग्रुप, मुंबई माता बाल संगोपन केंद्र आदिसह युवक युवती या उपक्रमात सहभागी झाले होते.
दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे भीमानदीचे विद्रुपीकरण होत चालले आहे. नदी लगतच्या गावातील, शहरातील नागरिकांच्या बेपर्वाईमुळे व शहरातील सांडपाणी नदीत सोडले जात आल्याने मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी दूषित बनले आहे. राजगुरुनगर शहरातील सर्व गटारांचे पाणी भीमा नदीपात्रात जमा होत असल्याने गेली 15 वर्षांपासून भीमा नदीत जलपर्णी आली आहे. त्यामुळे पाणी अजूनच दूषित होत चालले आहे. भीमा नदीमध्ये असलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यात जलपर्णी वाढत आहे. भीमानदीत जलपर्णी तयार झाल्यानंतर पाणी खाली सोडून जलपर्णी काढणे आवश्यक आहे; मात्र तसे न झाल्याने दिवसागणिक जलपर्णी नदीत वाढली आहे. ती इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, ती काढण्यासाठी दोन वर्षे लागतील. सामूहिक प्रयत्नातून नदी स्वच्छता उपक्रम सतत चालू ठेवणे गरजेचे आहे.
- गेली 15 वर्षापासून भीमानदीत जलपर्णी येत आहे. शहरातील ड्रेनेज नदी पात्रात मिसळत असल्याने जलपर्णी आली आहे. त्यामुळे पाण्यात ऑक्सिजन नसल्याने बॅक्टेरिया वाढल्याने पाणी दूषित झाले आहे. हे पाणी नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असल्याने नदी स्वच्छ करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने नगर परिषदेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. त्याला अनेक संस्था संघटना यांचा मोठा प्रतिसाद लाभला. सकाळी 7 वाजल्यापासून हा उपक्रम सुरु झाला टो यापुढे सतत चालू राहणार आहे. येथील भीमानदीमधील जलपर्णीचा समूळ नायनाट केला जाणार आहेत. त्यासाठी सतत दोन वर्षे काम करावे लागणार आहे.
-शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष राजगुरूनगर - आज सर्व मिळून पर्यावरण दिनाच्या दिवशी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आज पहिलं पाऊल टाकले आहे. पुढेही या कामात सातत्य ठेवले पाहिजे. एक नागरिक म्हणून पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. कोणी एका घटकाने हा प्रश्न सुटणार नाही तर सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. शहरातील सर्वांनी टाकलेले हे पहिले पाऊल असून यापुढे नगर परिषदेच्या बरोबरीने या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन काम केले पाहिजे.
-डॉ. सुधा कोठारी, अध्यक्षा चैतन्य महिला संस्था - जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने भीमा नदीत विस्तारलेली जलपर्णी काढण्याचे काम सर्व संस्था संघटना आणि युवक युवतींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. नदीतील जलपर्णी काढण्याचे कामात फौंडेशनच्या सदस्याचा मोठा सहभाग असून तो यापुढे कायम राहणार आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे आपली जबाबदारी असून ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे.
-अमर टाटिया, हुतात्मा राजगुरू सोशल फौंडेशन