भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याची सांगता
आळंदी- माऊलींच्या पालखीचे शनिवारी (दि. 27) अलंकापुरी नगरीत आगमन झाले. तर रविवारी (दि. 28) कामिका एकादशी व पालखी सोहळ्याच्या सांगतेनिमित्त रिमझिम पावसातही माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्य परिसरातून आलेल्या लाखो भाविकांनी एकच गर्दी केल्याने आळंदी भाविकांनी फुलली होती.
माऊलींच्या पालखीची रविवारी दुपारी नगरप्रदक्षिणा होऊन, पालखी हजेरी मारुती मंदिरात विसावली असता तेथे किर्तन सेवा होऊन स्थानिक ग्रामस्थ व देवसंस्थानच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व घटकांतील मानकरी, मान्यवरांचा नारळ प्रसाद देऊन यथोचित असा सन्मान करण्यात आला. आरती होऊन पालखी पुन्हा मंदिरात विसावली. तब्बल 31 दिवस सुरू असलेल्या किर्तन सेवेची समाप्ती होऊन सोहळ्याची सांगता झाल्याचे देवसंस्थानचे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. इंद्रायणी दुथडी भरून वाहत असल्याने दोन्ही पुलावरती पाणी पाहण्यासाठी आळंदीकरांसह भाविकांनी देखील गर्दी केली होती, शिवाय सेल्फी काढण्याचा मोह देखील अनेकांना आवरता आला नाही.
- वाहनचालकांनी दिली बेशिस्तपणाची पावती
देहू फाटा (वाय जंक्शन), संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर भाविकांच्या गर्दीसह रस्त्याच्या दुतर्फा अनेकांनी आपली वाहने बिनदिक्कतपणे लाऊन वाहतूककोंडीत भर टाकून आपल्या बेशिस्तीपणाची जणू पावतीच दिली. तर वाहतूक पोलिसांनी अनेक वाहनांवर कारवाई केली;मात्र अनेकांनी पोलिसांच्या नजरा चुकवित वाहने रस्त्यावर लावून गायब झाल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडत होती. आळंदी देवाची, दिघी पोलीस ठाण्याच्यावतीने रविवारी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.