इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय समुदायाने जर भारतातील ताज्या स्थितीची दखल घेतली नाही, तर पाकिस्तानमध्ये निर्वासितांची आणखी समस्या निर्माण होईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. भारताची अनिर्बंध विचारसरणी घातक ठरू शकते, असेही खान म्हणाले. इस्लामाबादेत आयोजित करण्यात आलेल्या निर्वासितांच्या दोन दिवसीय परिषदेमध्ये ते बोलत होते.
या संबंधीचे वृत्त पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे.अफगाणिस्तानातील निर्वासित पाकिस्तानमध्ये आल्याला 40 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही परिषद आयोजित केली गेली होती. भारत पाकिस्तानला केवळ 11 दिवसात नष्ट करू शकेल. हे नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य अण्वस्त्रसज्ज आणि खूप मोठी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानासाठी बेजबाबदारपणाचे आहे, असेही खान म्हणाले.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनिओ ग्युटरेझ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याच उपस्थितीत इम्रान खान यांनी हा थयथयाट केला. “हिंदुत्वाच्या विचारसरणीमुळेच काश्मीरमध्ये 200 दिवस निर्बंधाखाली आहे. याच विचारातून भाजपप्रणित केंद्र सरकारने 20 कोटी मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रीयत्वाशी संबंधित 2 कायदे केले आहेत.’ असेही ते म्हणाले.
“सीएए’ आणि जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याबाबत ते बोलत होते. जर भारताच्या अनिर्बंध विचारसरणीला आंतरराष्ट्रीय समुदायाने रोखले नाही, तर भारतातील मुस्लिम पाकिस्तानमध्ये स्थलांतर करतील आणि पाकिस्तानात निर्वासितांचा मोठा प्रश्न निर्माण होईल. संयुक्त राष्ट्राने यासंदर्भात हस्तक्षेप करावा, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.