शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची माहिती
पिंपरी – युवकांना रोजगार पुरविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणला आहे. तर, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायदा देशभरात लागू करण्याचे नियोजन आहे. “एनआरसी’ची गरज नाही. त्याऐवजी युवकांना जाणवणारी बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय बेरोजगार नोंदणीची (एनआरयू) मागणी केली आहे. त्याविरुद्ध युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेला युवक कॉंग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदेश बोर्डे, युवक कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस वीरेंद्र गायकवाड, सौरभ शिंदे आदी उपस्थित होते. बनसोडे म्हणाले, देशात बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक असल्याचा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने दिला आहे. विशेषत: नोटबंदीनंतर ही परिस्थिती उद्भवली आहे.
भाजप खासगीकरणाचा पुढाकार करीत सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी करीत आहे. भारतीय रेल्वे बोर्ड 3 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. यूपीएससीने 2014 मध्ये 1 हजार 364 जागांची जाहिरात काढली होती. हा आकडा खाली येऊन 2018 मध्ये फक्त 759 जागा भरण्यास काढल्या आहेत. रेल्वे किंवा एसएससीच्या जाहिराती येतात. मात्र, परीक्षा घेतल्या जात नाहीत. भाजपाच्या खासदारांनी केंद्र सरकारमधील रिक्त पदासंदर्भात संसदेत प्रश्न विचारले होते. त्यावर सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार केंद्र सरकारमध्ये एकूण 38.02 लाख पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास 6.83 लाख पदे रिक्त आहेत. म्हणजेच ही पदे भरण्यास मोदी सरकारची अनास्था असल्याचे स्पष्ट होत आहे.
युवकांमधून एनआरयूला समर्थन मिळविण्यासाठी युवक कॉंग्रेसने 8151994411 हा टोल फ्री क्रमांक खुला केला आहे. बेरोजगार युवक टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन एनआरयूच्या मागणीला पाठिंबा देऊ शकतील. युवक कॉंग्रेसकडून शाळा-महाविद्यालयांच्या ठिकाणी बेरोजगार तरुणांच्या नोंदणीसाठी केंद्र सुरू केले जातील. शहरातील युवकांमध्ये त्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.