मुंबई -राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे अभिनेता सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी वादळात सापडले असून नोव्हेंबर महिन्यात बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुका होईंपर्यंत त्यांच्यावर लागलेला सुशांतच्या हत्येचा डाग पुसला जाण्याची शक्यता नाही.
वांद्रे येथील स्वत:च्या निवासस्थानी सुशांतसिंह याने आत्महत्या केली असल्याचा गुन्हा वांद्रे पोलिसांनी नोंदवला. त्यानंतर हायप्रोफाईल आत्महत्या असल्याने सर्व प्रसारमाध्यमांत हे प्रकरण गाजत असतानाच पोलिसांनी मात्र संथगतीने तपासाचे काम सुरू ठेवले. वेळेचे बंधन असतानाही पोलिसांनी संशयास्पद स्थितीत पन्नासहून अधिक दिवस तपासकामात दिरंगाई केली.
सुशांत प्रकरणात सेलिब्रिटींकडे चौकशी करावयाची असल्यामुळे त्यांच्या वेळा झटपट मिळत नसल्याची सबब शिताफीने तपास अधिकाऱ्यांनी पुढे केली. करोनाच्या परिस्थितीचेही एक प्रमुख कारण पोलीस देत राहिले.
तथापि, या प्रकरणात थोड्याथोडक्या नाहीतर सुशांतच्या आत्महत्येची फाईल बंद करताना पोलिसांनी 56 सेलिब्रिटींचे जाबजबाब नोंदवले. अगदी करण जोहरपासून सुशांतची बहीण मीतू सिंह यांच्यापर्यंत जवाब नोंदविण्यात आले. तरीही पोलिसांना सुशांतच्या आत्महत्येमागील ठोस कारण शोधण्यात अपयश आल्याने सुशांतची आत्महत्या हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला.
प्रसारमाध्यमातून पोलिसांत टिकेची झोड उठवली जाऊ लागली. या दरम्यान, बॉलीवूडमध्ये सुरुवातीलाच मुंसडी मारणाऱ्या पण नंतर काम मिळण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कंगना राणावतने करण जोहरपासून सलमान, शाहरूख अगदी मोठमोठ्या सिनेदिग्दर्शक, निर्मात्यापर्यंत अनेकांची नावे घेत राजकारण्यांचे लक्ष वेधले.
थेट नाव न घेता तिने मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही अंगुलीनिर्देश करत खळबळ उडवून दिली. तपासात कोणाच्या तरी सांगण्यावरून मर्यादा येत असल्याचा तिच्या वक्तव्याचा रोख होता. त्यामुळे तपास करण्यात सरकारचे अपयश असल्याचा डंका राजकीय स्तरांवरून पिटण्यास सुरुवात झाली.