पाटणा – बिहारमध्ये चमकी तापाच्या साथीने आतापर्यंत जवळपास १०० बालकांचा बळी घेतला असून अजूनही रुग्णालयांमध्ये चमकी तापाची लागण झालेल्या अनेक बालकांवर सध्या उपचार सुरु आहेत. अशातच काल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी चमकी तापाने ग्रासलेल्या बालकांच्या कुटुंबीयांची मुझ्झपूर येथील श्री कृष्ण मेडिकल कॉलेज येथे भेट घेत त्यांना आवश्यक ती सर्व सरकारी मदत पुरवण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
राज्यातील चमकी तापाने पीडित असलेल्या बालकांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय राज्य मंत्री अश्विनी कुमार चोबे आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी एका संयुक्त पत्रकार परिषद देखील आयोजित केली होती.
दरम्यान, चमकी या जीवघेण्या आजाराबाबत पत्रकार परिषद सुरु असतानाच बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींकडे काल सुरु असलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या स्कोरची विचारणा केली. बिहारच्या आरोग्य मंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एवढ्या गंभीर विषयाबाबत पत्रकारांसमोर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिका मांडत असताना बिहारच्या आरोग्य मंत्र्यांनीच अशी बेजबाबदार कृती केल्याने त्यांच्यावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास १०० बालकांचा बळी घेणाऱ्या चमकी तापाबाबत माहिती देताना बिहारच्या आरोग्य मंत्र्यांनीच क्रिकेटबाबत माहिती विचारल्याने बिहार सरकार बालकांच्या प्रकृतीबाबत खरचं गंभीर आहे का? असा प्रश्न उपथित होत आहे.
#WATCH Bihar Health Minister Mangal Pandey asks for latest cricket score during State Health Department meeting over Muzaffarpur Acute Encephalitis Syndrome (AES) deaths. (16.6.19) pic.twitter.com/EVenx5CB6G
— ANI (@ANI) June 17, 2019