मागील पंधरवड्यात बाजारानं चांगलीच तेजी-मंदी अनुभवली. सेन्सेक्स ३६४०० च्या पातळीवरून ३७८०० च्या वर जाऊन आला तर निफ्टी५० हा विस्तारित पाया असणाऱ्या निर्देशांकानं देखील ४०० अंशांची वध-घट अनुभवली. पट्टीच्या ट्रेडर्सना ही वध-घट चार पैसे देऊन जाते व कधी कधी खिशातले देखील घेऊन जाते परंतु गुंतवणूकदारांच्या मनात भिती, धास्ती, शंका, निराशा अशा एक ना कित्येक भावना जागृत करून ठेवते.
पारंपारिकरित्या आपल्याला माहीतच आहे की बाजारातील सर्वसाधारण घट ही विविध आणि मुख्यत: असंबंधित कारणांच्या एकत्रीकरणामुळं होते आणि या दोन आठवड्यांत असे हे घटक दुर्दैवानं एकत्र आले. आता सध्याच्या परिस्थितीत, प्रमुख व आपल्या बहुतेकांच्या परिचयाचं कारण म्हणजे भारतीय भांडवल बाजारासंबंधित कर आकारणी. मूलभूत भांडवली नफा कर तसेच एफपीआय इश्यू. इथं अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं दिसतंय की, भारतीय बाजारात त्यांनी मिळवलेल्या पैशावरील कर आकारणी त्यांच्या हिशेबानं जास्त आहे आणि त्यामुळं असे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून बाजारातून बाहेर निघत आहेत. बाजारातील परकीय गुंतवणुकीचे आकडे पहिले तर हे सहज लक्षात येईल. या कॅलेंडर वर्षात पहिले चार महिने हे नक्त खरेदी दर्शवत होते ज्यात एप्रिल मधील आकडेवारी सर्वांत जास्त म्हणजे ३२,३७१ कोटी रु. होती. परंतु जुलैची निव्वळ विक्री १६८७० कोटी रु होती तर ऑगस्टमधील गेल्या दहाच दिवसांचा आकडा हा निव्वळ विक्रिचाच आहे व तोसुद्धा ९०४९ कोटी रु.
बाजारातील घुसळण अपरिहार्य, उरेल ते बावनकशी (भाग-2)
दुसरी कारणं ही बाह्य स्वरूपाची आहेत ज्यांत पहिलं कारण हे मुख्यत: अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापार युद्धामुळे उद्भवतं. ज्यामुळं जगभरातील मार्केट्स खराब स्थितीत आहेत. दुसरं कारण देता येईल ते म्हणजे, हाँगकाँगमधील अशांतता आणि हाँगकाँगमध्ये १९८९ च्या तिआनॲनमेन स्क्वेअर प्रकारणाची पुनरावृत्ती होतीय का याची भीती. ज्या बंडामध्ये हजारो लोकांनी आपले जीव गमावले होते.ज्याच्या होणाऱ्या परिणामांच्या अंदाजाचा आंतरराष्ट्रीय बाजाराचे विश्लेषक आणि वित्तीय माध्यमांनी देखील वाढत्या प्रमाणात बाऊ केला गेला.अजून एक कारण म्हणजे जागतिक मंदीचे संकेत देणारे १० वर्षं व २ वर्षं यांमधील बॉण्ड यील्ड आलेखांचं उत्क्रमण.