अजित पवारांचा शिवसेना-भाजपाला इशारा; आघाडी 175 जागा जिंकणार
मुंबई : अनेक जण राष्ट्रवादी पक्ष सोडून जात आहेत. हरकत नाही. आमच्या नेत्यांची फोडाफोडीची सुरूवात त्यांनी केली. पण त्याचा शेवट आता आम्ही करू, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप- शिवसेनेला दिला. आघाडी व मित्रपक्षांचे जागावाटप पुर्ण झाले असून 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आघाडीची अधिकृत घोषणा व उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असे सांगतानाच ‘अब की बार आघाडी 175 पार’… असा नाराही त्यांनी यावेळी दिला.
शहापूरमधील शिवसेनेचे नेते व माजी आमदार दौलत दरोडा आणि कॉंग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढाचे आमदार भारत भालके यांनी सोमवारी सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
उमेदवार कोण याची चिंता नाही : अजित पवार
बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्षाला कधीच कमकुवत समजत नाही. प्रत्येक उमेदवारांना आम्ही तुल्यबळ उमेदवार समजतो. बारामतीच्या जनतेने आम्हाला लोकसभा असो की विधानसभा कायमच लाखाच्या मताधिक्याने विजयी केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवार कोणताही असला तरी त्याची काळजी नाही. बारामतीकर दीड लाखांच्या मताधिक्याने यंदा मला निवडून देतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार म्हणाले, कॉंग्रेस- राष्ट्रवादीसह इतर पक्षातील आमदार, नेत्यांना सत्ताधारी भाजप- शिवसेनेने राजकीय अमिष दाखवून युतीत घेतले. त्यामुळे त्या त्या मतदारसंघातील भाजपा-शिवसेनेचे अनेक निष्ठावंत व इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले असून ते आमच्या संपर्कात आहेत. जे येतील त्यांचे स्वागत, त्यांना योग्य वेळी पक्षात प्रवेश देवून उमेदवारी दिली जाईल, असे सांगत राजकारणात काट्यानेच काटा काढायचा असतो. फोडाफोडीची सुरुवात त्यांनी केली, आता आम्ही आमच्या पद्धतीने शेवट करू, असे अजित पवार म्हणाले.
आदित्य ठाकरेंविरोधातील उमेदवाराचा निर्णय वरिष्ठ ठरवतील
आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही, त्याबाबत मित्रपक्षांशी चर्चा करुन पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. सुप्रिया सुळे यांना राज्यसभेत शिवसेनेने पाठिंबा दिला होता. ती काही पंचवार्षिक निवडणूक नव्हती. आदित्य यांना सहकार्य करायचे ठरवलेच तर मित्रपक्षांशी चर्चा करणार. कारण वरळीची जागा कॉंग्रेसने मागितली आहे. सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी ती जागा निवडून आणली आली आहे. पृथ्वीराज चव्हाण कॉंग्रेसकडून लढले तर ठीक अन्यथा आम्ही लढू. लवकरच तेथील उमेदवाराची घोषणा करू असेही अजितदादांनी स्पष्ट केले.