पिंपरी – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून पिता-पुत्रावर खूनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री आठ वाजताच्या सुमारास सुस येथील ननावरे वस्तीमध्ये घडली. या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत कचरे, विकास कचरे, राखी कचरे, चैताली विकी कचरे, कामिनी धुमाळे (सर्व रा. ननावरे वस्ती, सुस, ता. मुळशी), सोन्या आणि महेंद्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी टीना रशिकांत कचरे (वय 35) यांनी सोमवारी (दि. 24) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टिना यांच्या मुलाचे आणि आरोपींसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांनी शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला तलवारीने तर मुलाला कुऱ्हाडीने, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांचे पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
याच्या परस्पर विरोधात राखी शशिकांत कचरे (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रशिकांत सोपान कचरे, तुषार रशिकांत कचरे आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.