मंचर – घोडेगाव-श्रीक्षेत्र भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटात गुरुवारी (दि. 22) पहाटे पाच ठिकाणी दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साहाय्याने दरड बाजूला करून सुमारे आठ तास ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर, तळेघर, निगडाळे, कोंढवळ, पोखरी, राजेवाडी आदी परिसरात बुधवारी (दि. 21) रात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे पोखरी घाटात पाच ठिकाणी दरडी कोसळून गुरुवारी (दि. 22) पहाटे तीन वाजता रस्ता बंद झाला.त्यामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या 20 गावांचा संपर्क तुटला. वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्या होत्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे घोडेगाव येथील उपअभियंता सुरेश पठाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या साह्याने घाटात कोसळलेल्या दरडी बाजूला काढून घाटातील एकेरी वाहतूक गुरुवारी सकाळी 11 वाजता पूर्ववत केली.
पावसाचा जोर एवढा होता की डोंगर माथ्यावर असलेला दगडी भरावा वाहून थेट घाटात येऊन पडल्याने वाहतूक पूर्णपणे बंद पडली. दरड कोसळत असताना कोणतेही वाहन नसल्याने येथे दुर्घटना घडली नाही.
पोखरी घाटात संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. भविष्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना करावी. भीमाशंकरकडे जाणारा हा घाट वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून त्या माध्यमातून सुमारे 20 गावांची दैनंदिन वाहतूक सुरू असते. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना करावी.
– संजय गवारी, सभापती, (आंबेगाव तालुका पंचायत समिती)