निष्क्रिय राज्यकर्त्यांमुळे पाणीटंचाईची दाहकता
उरुळी कांचन- जिल्ह्यातील सुजलाम, सुफलाम बागायती पट्टा समजला जाणाऱ्या हवेली तालुक्यात उरुळी कांचन, सोरतापवाडी, तरडे, वळती, कोरेगाव मूळ, शिंदवणेसह अन्य गावात देखील पाणीटंचाई व दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. एका बाजूने मुळा मुठा नदी तर दुसऱ्या बाजूला जुना व नवा कालवा असून देखील धरण उशाला, कोरड घशाला’ अशी म्हणण्याची वेळ शेतकरी व नागरिकांवर आली आहे.
पिके जळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तराळले आहेत. जिल्ह्यातील खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात गतवर्षी पावसाळ्यात कमी पाऊस पडल्याने धरण क्षेत्रात पाणीसाठा कमी झाला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी पाऊस पडतो. त्यामुळे धरण भरून नदीला पाणी सोडले जाते. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. पाणीसाठा अल्प असल्यामुळे प्रशासनाने नियोजन करण्याची गरज होती. मात्र, जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांना व नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबरोबर दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रात पुणे शहर व ग्रामीण भाग अवलंबून आहे.
कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु पाणीसाठा कमी झाल्याने व पुणे महानगरपालिका दररोज 1350 ते 1450 एमएलडी पाणी सर्व नियम मोडीत काढून शहराला पाणीपुरवठा करीत आहे. यामुळे जलसंपदा विभागाला उन्हाळ्यात ग्रामीण भागाला कालव्यातून आवर्तन देऊन पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही. तत्कालीन पालकमंत्र्यांनी पुणे शहराची तहान भागवाण्याच्या नादात ग्रामीण भागाचा विचार करून नियोजन केले पाहिजे होते. मात्र, नियमबाह्य पाणी पुणे शहराला जात असल्याने पूर्व हवेलीतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. त्यामुळे उरुळी कांचनसह विविध गावाला पाण्यासाठी वणवण करावे लागते.
पुणे महानगरपालिकेने नियमानुसार पाणी उचलेले असते तर किमान 2 टीएमसी पाणी वाचले असते. मात्र, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी ग्रामीण भागाचा विचार करून जलसंपदा विभागाची कानउघडणी करणे गरजेची होती. परंतु लोकप्रतिनिधीच्या “तेरी चूप मेरी चूप’ या भूमिकेमुळे पूर्व हवेलीतील शेतकरी व नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेतीचे झाले वाटोळे आता पिण्यासाठी तरी पाणी द्या? अशी म्हणण्याची वेळ शेतकरी व नागरिकांवर आली आहे.