सातारा, दि. 8 (प्रतिनिधी)
महापुराने दाणादाण उडवलेल्या पाटण, कराड शहरासह नदीकाठी असलेल्या सर्वच गावांमध्ये आता पिण्याचे पाणी, अन्नधान्य व पसरणाऱ्या रोगराईचे आव्हान उभे राहिले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने मायक्रो प्लॅनिंग करणे गरजेचे बनले आहे. समाजातील दानशूरांनही त्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच मदत करणाऱ्यांनी ती मदत कुठे, कशी करायची याचा आराखडा असणे क्रमप्राप्त बनले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये कराड, पाटण शहरासह गावात शिरलेले पुराचे पाणी दिवसभरात कमी झाले आहे. पाउस व पुराच्या दणक्याने सर्वत्रच पिण्याच्या पाण्याचे तीनतेरा वाजले आहेत.
त्या दुरुस्त होण्यासाठी वेळ लागणार आहे. पुरामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य राहणार आहे. यामुळे गावातील आरोग्याचा प्रश्न आ वासून उभा राहणार असून साथीच्या रोगाचा फैलाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पाउस व पुराचा अद्याप धोका कायम असताना आता त्यानंतर हे निर्माण होणारे प्रश्न असल्याने केवळ शासकीय यंत्रणा ते आव्हान पेलण्याची शक्यता कमी आहे. यासाठी जिल्हावासीयांनी पुढे आले पाहिजे.
यासाठी प्रशासनाने पुर बाधीत नागरिकांची मदत करणे अपेक्षित बनल आहे. समाजातील दानशूरांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रामुख्याने डॉक्टर संघटना, मेडीकर असोसिएशन, भुसार व किराणा दुकान संघटना, व्यापारी संघटना, फळे व पालेभाज्या संघटना, बांधकाम व्यवसायिक यांनी पुरग्रस्त गावातील लोकांसाठी धान्य, औषधे, साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यासंबंधी उपायोजना, गावातील स्वछता ही अत्यावश्यक बनली आहे.
आता सध्या पुरग्रस्तांना आपल्याच गावात, घरात पुनर्वसन करण्यासाठी मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने पुढे आले पाहिजे. हे सर्व होण्यासाठी नेमकी कुठे? किती? व काय मदत पाहिजे? हे स्पष्ट असणे गरजेचे आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की ज्या नागरिकांना मदत करायची आहे त्यांनी स्थानिक पोलीस अधिकांना संपर्क करावा .