पुणे – खडकवासला धरणामधील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने महापालिकेने 10 टक्के पाणी कपात सुरू केली आहे. दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून ही कपात सुरू असून आवश्यकता भासल्यास एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल, असे सूतोवाच आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये केले. त्यामुळे काही दिवस तरी पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.
महापालिकेतील पक्षनेत्यांची शुक्रवारी बैठक झाली. याला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सेनेचे गटनेते संजय भोसले, आरपीआयच्या सुनिता वाडेकर, मनसेचे वसंत मोरे, एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांच्यासह आयुक्त सौरभ राव आणि महापालिकेतील विभाग प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील पाणी पुरवठ्यामध्ये कपात सुरू करण्यात आली आहे का, असा प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आला. तेव्हा 10 टक्के पाणी कपात सुरू करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाच्या प्रमुखांनी दिली.
पुण्याच्या पूर्व भागामध्ये पाणी कमी दाबाने येत असून त्यामुळे या भागातील अडचणी वाढल्या आहेत. त्यावेळी याविषयाचा खुलासा झाला. धरणामध्ये 2.2 टीएमसी पाणीसाठा शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. तर आगामी पालखी, बाष्पीभवन आणि दौंडसाठी 1.2 टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे निम्म्या पुण्याला एक दिवसाआड पाणी द्यावे लागणार आहे.
महापालिका दररोज 1,350 एमएलडी पाण्याचा पुरवठा करते. हा पुरवठा 1,115 एमएलडीवर आणण्यात आला आहे. आणखी आठ दिवस पावसाची वाट पाहून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
ठरवून दिलेल्या कोट्यानुसारच पाणी
पाणी कपात सुरू केली आहे का, अशी विचारणा उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांची भेट घेऊन केली. त्यावर 31 जुलैपर्यंत ठरवून दिलेल्या कोट्यानुसारच महापालिकेला पाणी दिले जाणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात जलसंपदा विभागाने केलेली नाही, असे जलसंपदा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.