शालेय शिक्षण विभागाच्या वर्ग-1 मधील अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या
पुणे -राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातील एकूण 118 अधिकाऱ्यांच्या चार दिवसांपूर्वी बदल्या करण्यात आल्या. मात्र, यात फारशा बड्या अधिकाऱ्यांचा समावेशच नाही. प्राथमिक शिक्षण विभागासह इतर महत्त्वाच्या विभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना मुहूर्त कधी सापडणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
विविध जिल्ह्यांमधील शालेय शिक्षणाच्या अनेक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. प्रामुख्याने वर्ग 1 मधील केवळ 22 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील 14 शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थांमधील 4 प्राचार्य व 4 वरिष्ठ अधिव्याख्याता यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
वर्ग 2 मधील 96 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात 62 उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचा सर्वाधिक समावेश आहे. पंचायत समितीच्या शालेय पोषण आहार विभागातील 6 अधीक्षक, प्राथमिक, माध्यमिक व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, शिक्षण आयुक्त कार्यालयामधील 15 अधीक्षक, व्यावसायिक विकास संस्थांमधील 13 अधिव्याख्याता यांच्याही बदल्या झाल्या आहेत.
प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांची राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी तर टेमकर यांची विद्या प्राधिकरणात बदली होणार अशी चर्चाही रंगू लागली आहे. चौहान यांच्या जागी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याकडे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्तपद व कोल्हापूर विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे सुपे यांचीही कोणत्या तरी एकाच पदावर बदली होणार आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण सहसंचालक राजेंद्र गोधने हे ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होणार असून हे पदही रिक्त होणार आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदही रिक्त आहे. या पदांवर संधी मिळावी यासाठीही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.
महत्त्वाच्या विभागांवर डोळा
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे, पुणे बोर्डाचे सचिव बबन दहीफळे, जिल्हा परिषदेतील माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे यांचीही बदली होणार असल्याची चर्चा सुरु आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (विद्या प्राधिकरण) संचालक, बालभारतीचे संचालक, एनआयसीचे संचालक अशा तीन विभागाची सूत्रे डॉ.सुनील मगर यांच्याकडे आहेत. मगर हे येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या विभागांच्या संचालक पदांवर काही बड्या अधिकाऱ्यांनी डोळा ठेवला आहे. काही अधिकाऱ्यांनी बदल्यांसाठी विनंती अर्जही केलेले आहेत. मंत्रालयात बदल्यांबाबत मोठी खलबते सुरुच आहेत. बड्या अधिकाऱ्यांनी ठराविक “क्रिमी’ विभागासाठीच हट्ट धरल्यामुळे बदल्यांचा तिढा सुटता सुटेना अशी अवस्था निर्माण झाली आहे.