पुणे – सोसायटीच्या मीटिंगमध्ये पाण्यावरून चर्चा सुरू असताना चेअरमनने सदस्याला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तब्बल आठवड्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. यासाठी फिर्यादीला पोलीस आयुक्तांचे दार ठोठवावे लागले. यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कात्रज येथील भारती विहार सोसायटीत दि.31 मार्चला ही घटना घडली. याप्रकरणी विश्वजीत कीर्तीकर यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे पुणे रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर आहेत. तर आरोपी मिलिंद पाटील हा प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक असल्याचे सांगितले जाते.
यासंदर्भात दैनिक “प्रभात’शी बोलताना विश्वजीत कीर्तीकर यांनी सांगितले, “सोसायटीत पाण्याचे समान वाटप होत नव्हते. यासंदर्भात सेक्रेटरीने दि.31 मार्चाला बैठक बोलावली. यावेळी मुद्दा मांडताना मी सोसायटीचे चेअरमन मिलिंद पाटील आणि त्याचे मित्र सोसायटीच्या “ए’ आणि “बी’ विंगमध्ये राहतात. त्यांना 24 तास पाणी मिळत असल्याचा मुद्दा मांडला. याच वेळी पाटील तेथे दाखल झाले. त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली. माझ्या कानशिलात लगावून मला लाथाबुक्क्यांनी मारले. यावेळी तेथे उपस्थित महिलांनी मध्यस्थी केल्याने माझा जीव वाचला. मी तसाच भारती विद्यापीठ पोलीस चौकीत गेलो. तेथेही पाटील याने मागोमाग येऊन मला मारहाण करण्याची धमकी दिली. मात्र, तेथे उपस्थित पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी आणि भोसले यांनी त्याला थोपवले. मात्र, माझी तक्रार पोलीस ठाण्यास देण्यास सांगून मला ससूनला पाठवले. तेथील वैद्यकीय प्रमाणपत्र पोलीस ठाण्यात दिले, मात्र तक्रार दाखल करुन घेतली नाही. पोलिसांनी दि.2 एप्रिल रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. हा प्रकार मी सोसायटीत सांगितला असता, त्यांनी मला पाठिंबा देत चेअरमनचा निषेध नोंदवणारी बॅनर्स सोसायटीबाहेर लावली. तसेच चेअरमनची हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, हे बॅनर्सही पाटील यांनी फाडले. दखलपात्र व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी मला पोलीस आयुक्तांकडे दाद मागावी लागली. त्यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली तसेच पोलीस ठाण्याला फोन लावत तक्रार दाखल करण्यास लावली. दि.6 एप्रिल रोजी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. गंभीर घटना असूनही पोलिसांनी त्याची लवकर दखल घेतली नाही. यामुळे आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला आहे.’
भारती विद्यापीठ सोसायटीच्या बैठकीमध्ये पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा सुरू होती. यावेळी कीर्तीकर यांना सोसायटीच्या चेअरमनकडून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी ऍट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.
– विष्णू पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ ठाणे.