पुणे – शिवसेनेमुळे भामा आसखेड योजना ठप्प झाली आहे. पण, सत्तेसाठी भाजप आपल्या मित्र पक्षाला दुखवायला तयार नाही. त्यामुळे वडगावशेरी भागातील नागरिक मात्र पाण्यापासून वंचित राहात आहेत. पाण्याचे राजकारण करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना आता घरी बसवा, असे आवाहन हमारी अपनी पार्टीचे उमेदवार राजेश अग्रवाल यांनी शुक्रवारी येथे केले.
राजेश अग्रवाल यांनी ताडीवाला रोड, बोट क्लब रोड आणि ढोले पाटील रोड या परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. पुणेकर पाण्यासाठी होरपळू लागला आहे. चोवीसतास पाणीपुरवठा योजना ही केवळ पुणेकरांच्या खिशावर डल्ला मारण्यासाठी आणलेली आहे. सत्ताधारी आणि ठेकेदार हे पुणेकर नागरिकांना लुटत आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष असणाऱ्या हमारी अपनी पार्टीच्या उमेदवारांना निवडूण द्या, असे आवाहन अग्रवाल यांनी केली.
यावेळी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. अग्रवाल यांनी सर्वप्रथम आपण वडगावशेरीमधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे सुद्धा सांगितले. या पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.