400 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
– गणेश आंग्रे
पुणे, 8- पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या कामात गैरहजर राहणे, निवडणुकीचे काम करण्यास टाळाटाळ आता अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना महागात पडणार आहे. यात पुणे मतदारसंघातील 300 आणि बारामतीमधील 100 अशा एकूण 400 जणांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे खोटी कारणे देऊन निवडणुकीच्या काम टाळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात मतदारांची संख्याही मोठी आहे. मतदार नाव नोंदणी मोहिमेत सुमारे एक लाख नवमतदारांची संख्या वाढल्याने मतदान केंद्रांची संख्याही वाढली. जिल्ह्यात 900 ने मतदान केंद्रांची संख्या वाढून मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 906 इतकी झाली आहे. त्यामुळे मनुष्यबळाची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाला 40 हजार मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
निवडणुकीच्या कामास सर्वांत आधी मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या टप्प्यापासून सुरूवात होते. नोव्हेंबर 2018 पासून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय-निमशासकीय तसेच शैक्षणिक संस्थांकडून कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने मागविली होती. त्यासाठी “एनआयसी’ने संगणक प्रणाली तयार केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे सुमारे 60 हजार कर्मचाऱ्यांची माहिती जमा झाली.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कर्मचारी यांची गरज आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर एकूण चार कर्मचारी उपस्थित असतात. तसेच ऐनवळी आवश्यकता भासल्यास कर्मचारी कमी पडू नये, म्हणून जादा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येते. यानुसार जिल्हा प्रशासनाने 40 हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाची ऑर्डर काढली आहे. ती हाती मिळताच कर्मचारी निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. ज्या व्यक्तींची खरंच अडचण होती, त्यांची ड्युटी रद्द करण्यात आली. मात्र, काही बहाद्दरांनी खोटी कारणे, न पटणाऱ्या सबबी सांगत बनवाबनवीचा प्रयत्न केला.
त्यामुळे हा प्रकार म्हणजे निवडणुकीचे काम करण्यास टाळाटाळ असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. यापूर्वी कारवाई करणाच्या इशारा देऊनही या कर्मचाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या कामचुकवेगिरी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत निवडणुकीच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिले तसेच काम करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी 400 जणांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाईचे पाऊल प्रशासनाने उचलले आहे.
विभागीय चौकशीही होणार
या कामचुकारांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईवर न थांबता या 400 जणांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे पत्रही संबंधित कर्मचाऱ्यांच्या विभाग प्रमुखांना दिले आहे. यामुळे निवडणुकीचे काम टाळण्याच्या प्रकाराला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.