पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करण्यासाठी शिक्षण विभागाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. शाळा सुरू होण्याची तारीख जवळ येऊन ठेपलेली असताना अद्यापही प्रवेश प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याने पालकांवर्गातून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
“आरटीई’ प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 793 जागा दर्शविण्यात आल्या. यासाठी 2 लाख 44 हजार 90 पालकांनी ऑनलाइन अर्जही दाखल केले आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी 8 एप्रिल रोजी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली. यात 67 हजार 716 प्रवेशाच्या जागा काढण्यात आल्या. पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून 47 हजार 35 पालकांनी आपल्या मुलांची शाळेतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे. अपेक्षित शाळा न मिळाल्यामुळे व अर्जात चुकीची माहिती न मिळाल्यामुळे 20 हजार 681 पालकांनी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
पुणे जिल्ह्यात 963 शाळांमध्ये 16 हजार 594 प्रवेशाच्या जागा आहेत. यासाठी 53 हजार 697 पालकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात पहिल्या फेरीसाठी 12 हजार 566 जागा काढण्यात आल्या होत्या. त्यात 8 हजार 984 पालकांनी प्रवेश घेतले असून अद्यापही 3 हजार 582 पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. अर्जातील गुगल लोकेशन व इतर माहितींची दुरुस्ती करण्यासाठी पालक व संघटनांनी प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांच्याकडे अनेकदा मागणी केली. चौहान यांनी त्याची दखल घेऊन पालकांना अर्जात दुरुस्तीसाठी दोनदा मुदतवाढही दिली आहे. आता पुन्हा एकदा 11 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लॉटरीचे वेळापत्रक अद्यापही जाहीर नाही
बहुसंख्य शाळा या 17 जूनपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी “आरटीई’ प्रवेशाची दुसरी व तिसरी फेरी पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप शिक्षण विभागाकडून या फेऱ्यांच्या लॉटरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. त्याबाबतचे नियोजनही अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येऊ लागले आहे.