शिवाजीनगर: गेल्या अनेक वर्षांपासून पीएमसी कॉलनीचे पुनर्वसन रखडल्याने या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे. या पाटील इस्टेट परिसरातील नागरिकांना अस्वच्छता, स्वच्छतागृहांचा अभाव, सांडपाणी वाहिन्यांचा अभाव तसेच पाण्याच्या समस्या सामना करावा लागत असून हा परिसर समस्या मुक्त करण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहणार असल्याची ग्वाही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी या भागातील नागरिकांना दिली. बहिरट यांनी बुधवारी, पाटील इस्टेट, मुळा रस्ता तसेच पीएमसी कॉलनी (संभाजीनगर) भागात पदयात्रा काढली, यावेळी या भागातील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच बहिरट यांच्यासमोर वाचला. यावेळी त्यांनी हा परिसर समस्या मुक्त करण्यावरच आपला भर राहणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष निलेश निकम, माजी नगरसेवक उदय महाले, माजी नगरसेविका आशा साने, कार्याध्यक्ष राजू साने, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शैलेश साठे, संतोष उर्फ तात्या कोंडे, बाळासाहेब शिंदे, आत्माराम भेगडे, असिफ पटेल, चंद्रशेखर कपोते यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहिरट म्हणाले की, या भागातील समस्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या असून लोकप्रतिनिधींकडून त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र, यापुढे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून या भागासाठी नागरी सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात पीएमसी कॉलनीतील मनपा वसाहतींच्या पुनर्विकासासह पाटील इस्टेट परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या समस्या शासनाकडे पाठपुरावा करून सोडविण्यावर भर देणार आहे. तसेच या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठीही आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी मतदारांशी बोलताना सांगितले.