पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या गांधीनगर झोपडपट्टीचे तीस वर्षांपूर्वी सर्व्हेक्षण झाले होते. त्याच आधारे आता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नेहरुनगर रस्त्याचे गांधीनगर झोपडपट्टीच्या बाजूने रुंदीकरण करण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेने नियोजन केले आहे. रस्त्याचे हे रुंदीकरण म्हणजे याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून रहात असणाऱ्या गोरगरिब नागरिकांवर अन्याय आहे, असे प्रतिपादन कैलास कदम केले.
या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गांधीनगर परिसरातील बाधित नागरिकांनी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 28) महापालिकेवर धडक मोर्चा काढला. मोर्चाचे सभेत रुपांतर झाले, यावेळी कदम बोलत होते. पुढे बोलताना कदम म्हणाले, गांधीनगर झोपडपट्टीच्या समोर उच्चभ्रू नागरिकांची सोसायटी आहे. रस्ता रुंदीकरण त्या बाजूने व्हावे. विकास कामांना आमचा विरोध नाही, परंतु बाधित नागरिकांचे आहे त्याच परिसरात पुर्नवसन करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना नागरिकांच्या मागणीची दखल घ्यावी. तसेच या मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना माजी विरोधी पक्षनेते डॉ. कैलास कदम आणि शिष्टमंडळाने दिले.