पारनेर – पारनेर येथे तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (दि 31) राम मंदिर येथे झाली. या बैठकीमध्ये मतदार जागृती अभियानाविषयी चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाविषयी जागृत व प्रवृत्त करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांची जागृती होण्यासाठी पारनेर तालुका सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने मतदान जागृती अभियान या निवडणुकीदरम्यान राबविण्यात येणार असून, यासाठीची बैठक पारनेर येथे पार पडली. बैठकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविणे, म्हणजे लोकसभेला सरासरी 60 ते 70 टक्केच्या दरम्यान मतदानाचा अधिकार मतदार पार पाडतात. त्यामध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला 25 ते 30 टक्के मते पडत असतात. म्हणजे जवळपास न झालेल्या 30 ते 40 टक्केपेक्षा हा आकडा कमी आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करून मतदाराला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करा, मात्र मतदानापासून अलिप्त राहू नका, असा सल्ला हे कार्यकर्ते येत्या काळामध्ये देणार आहेत.
काही दिवसांत अण्णा हजारे यांचीदेखील भ्रष्टाचार निर्मूलन कमिटी स्थापन होणार असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढणार नसल्याचे हमीपत्र देण्याचे आवाहन केले. तालुक्यातून 1000 कार्यकर्ते झाल्यास तालुका कमिटी स्थापन करणार आहेत. भाऊसाहेब खेडेकर, शरद पवळे, बबन कवाद, संदीप पठारे, सहदेव घनवट, अविनाश देशमुख, संदीप ठुस, बाबाजी गुंड, संतोष सोबले, संदीप रोहकले, प्रवीण औटी, सुभाष ठुबे, राजेश खेडेकर, संजय पठारे, नवनाथ तनपुरे, मारूती खेडेकर, योगेश रेपाळे, अशोक गंधाक्ते, अनिल वैद्य, राम औटी, गुलाब वाबळे, गजानन ठुबे आदी उपस्थित होते.