पान टपरी फोडणारे दोघे जेरबंद ; पब्जीमुळे झाली दोघांची ओळख
पुणे,दि.22- पान टपरी फोडून 25 हजाराचा ऐवज चोरणाऱ्या दोघांना समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवार पेठेत करण्यात आली. या दोघा आरोपींची ओळख पब्जी गेममुळे झाली होती. यानंतर ते अनेकदा एकमेकांना प्रत्यक्ष भेटले होते. यातूनच त्यांनी एकत्र येत पान टपरीवर डल्ला मारला.
तुषार आनंद भरोसे(रा.शिवणे), विनय कैलास परदेशी(रा.विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
यासंदर्भात सविस्तर असे की समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनाई डायनिंग हॉलशेजारील श्रीनाथ पान टपरीचे कुलूप तोडून रोख 17 हजार आणी 8 हजाराची सिगरेटची पाकिटे असा 25 हजाराचा ऐवज 16 जानेवारी रोजी चोरण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास करताना पोलीस शिपाई साहिल शेख यांना पान टपरी फोडणारे आरोपी बुधवार पेठेतील समर्थ प्लाझा इमारतीजवळ येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस हवालदार सुशील लोणकर, राजस शेख, संतोष काळे, पोलीस नाईक प्रमोद टिळेकर, पोलीस शिपाई निलेश साबळे, साहिल शेख, गणेश कोळी, अनिल शिंदे, स्वप्निल वाघोले, सचिन पवार, सुमीत खुट्टे यांच्या पथकाने सापळा रचला होता. आरोपींच्या वर्णनावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सुशील लोणकर करत आहेत.