वेल्हे- वेल्हे तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विजेचे अनेक खांब पडले आहेत. त्यामुळे पानशेत विभाग चार दिवसांपासून अंधारात आहे. पानशेत विभागातील कुरवटी, आंबेगाव, वंजारवाडी, घोलपघर, कांबेगी, कोशिमघर, भालवडी, चिखली, कशेडी, घोलखड, गोंडेखल, कुर्तवडी, दापसरे, घोल, माणगाव, निवंगुणेवाडी, चांदर, खानु डीगेवस्ती अशा 14 गावांत वीज नाही. येथील नागरिकांना चार दिवसांपासून रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशावर रात्र काढावी लागत आहे.
वेल्हे तालुक्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये विजेचे खांब पडल्याने तारा जमिनीवर पडल्या आहेत. खांबाला लोबंकाळणाऱ्या वायरीमुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महवितरणने लवकरात लवकर विस्काळलेल्या वायरी व्यवस्थित करून वीजपुरवठा सुरुळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील गावांचा विजपुरवठा खंडीत झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याचा परिणाम व्यवसायावर ही झाला आहे. पानशेत विभाग दुर्गम असल्याने मेणबत्ती, रॉकेलही दिव्ये लावण्यासाठी मिळत नसल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.