नवी दिल्ली – निसर्गाचे व पर्यावरणाचे संवर्धन आणि विकास यांचा मेळ घालण्याचे काम आपण करू असे प्रतिपादन नवे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. जावडेकर यांच्याकडे गेल्या मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास खाते होते. त्या आधी त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणूनही काही काळ काम केले होते. आता नवीन मंत्रिमंडळात त्यांना माहिती आणि प्रसारण खात्याबरोबरच पर्यावरण आणि वन मंत्रालयाचा कार्यभारही देण्यात आला आहे. आज त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की माझ्यासाठी ही घरवासी आहे. ते म्हणाले की पर्यावरण रक्षण आणि विकास हे परस्परांना पूरक असले पाहिजेत अशी आमची मुख्य भूमिका असून मोदी सरकारने गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात हे सिद्ध करून दाखवले आहे. पर्यावरणातील पाणी, अग्नि, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वांचे संरक्षण हे आमचे मुख्य सूत्र राहील असे ते म्हणाले. त्यासाठी आमच्याकडे व्हिजन आहे.
पॅरीस कराराच्यावेळी भारताने जागतिक नेतृत्वाची भूमिका बजावली होती. जावडेकर हे पर्यावरणखात्याचे मंत्री म्हणून पॅरीस कराराच्या परिषदेला गेले होते. त्यांच्याच कार्यकाळात एप्रिल 2016 मध्ये पॅरीस करार झाला होता. आज आपण आपल्या मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेऊ आणि नंतरच आपण आपल्याशी बोलू असे आज त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना सांगितले. जावडेकर यांनी शुक्रवारीच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे.