लाखणगाव- बेडूक, साप तसेच वन्यप्राणी हे पर्यावरणीय साखळीतील महत्वाचा घटक असून त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी जंगलांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. पर्यावरणीय ऱ्हासामुळे अनेक संकटे उभी राहिली आहेत.निसर्गाचा ढासळलेला समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा आर., घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, रोटरी क्लबचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब पोखरकर, उद्योजक अजय घुले, भीमाशंकर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमंत गायकवाड, समाजसेविका कुसुम कर्णिक, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे, पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज, लाखणगावच्या सरपंच प्राजक्ता रोडे, मनोज रोडे, रामचंद्र ढोबळे, माजी सरपंच दस्तगीर मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. पर्यावरणातील बदलामुळे कोल्हापूर, सांगली परिसरात सध्या लाखो नागरिक पुराच्या पाण्यामुळे विस्थापित झाले आहेत. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले. कार्यक्रमाला पोंदेवाडी आणि पारगाव येथील विद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.