शैक्षणिक पात्रतेविषयी खोटी माहिती
स्मृती इराणींची उमेदवारी रद्द करण्याची कॉंग्रेसची मागणी
नवी दिल्ली – आपण पदवीधर आहोत असे आजवर सांगणाऱ्या भाजपच्या अमेठीतील उमेदवार स्मृती इराणी यांनी आपल्या निवडणूक अर्जात आपण पदवीधर नाही स्पष्ट नमूद केले आहे. त्या सिरीयल खोटारड्या असून त्यांच्या या खोटारडेपणामुळे त्यांनी अपात्र ठरवून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
कॉंग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आज पत्रकार परिषदेत ही मागणी केली. त्या म्हणाल्या की स्मृती इराणी या पदवीधर नाहींत असा दावा विरोधकांकडून जेव्हाजेव्हा केला गेला त्या प्रत्येक वेळी विरोधकांचा आरोप स्मृती इराणी यांनी धुडकाऊन लावला होता. पण परवा अमेठीत अर्ज दाखल करताना आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयी त्यांनी जी माहिती दिली आहे त्यात त्यांनी आपण दिल्ली विद्यापीठात पदवीसाठीचे केवळ रजिस्ट्रेशन केले असल्याचे व आपण अद्याप पदवीधर झालो नसल्याचे म्हटले आहे. या खोटारडेपणाबद्दल त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारीच रद्द केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्मृती इराणी या पदवीधर आहेत की नाहीत हा आमचा मुद्दाच नाही. त्या पदवीधर नसल्या तरी त्याला आमचा आक्षेप नाही पण येथे त्यांनी आपण पदवीधर असल्याची खोटी माहिती शपथेवर दिली आहे त्याला आमचा आक्षेप आहे. कोर्टातही त्या शपथेवर अनेक वेळा खोटे बोलल्या आहेत. अशा सिरियल खोटारड्यांना देशातील जनताच चोख उत्तर निवडणुकीच्या माध्यमातून देईल असेही त्यांनी नमूद केले. स्मृती इराणी यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या संबंधात प्रतिज्ञापत्रा द्वारे जी खोटी माहिती दिली आहे, त्यावरून त्यांना लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 125 ए च्या कलम 33 अन्वये दोषी ठरवण्यात यावे अशी मागणीही कॉंग्रेस प्रवक्त्या प्रियांका चर्तुेवादी यांनी केली आहे.
स्मृती इराणी यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात आपण 1993 साली बारावीची परिक्षा उत्तीण झालो असल्याचे नमूद केले आहे. मुक्त विद्यापीठाना त्यांनी वाणिज्य पदवीसाठी आपले नाव रजिस्टर केले आहे पण ही परिक्षा त्यांनी अद्याप पुर्ण केलेली नाही. मात्र सन 2014 सालच्या उमेदवारी अर्जात त्यांनी आपण पदवीधर असल्याचे नमूद केले होंते. त्याच वेळी विरोधकांनी त्या पदवीधर नसल्याचा दावा केला होता पण स्वत: स्मृती इराणी यांनी विरोधकांचा दावा फेटाळून लावत आपण पदवीधरच आहोत असे सातत्याने म्हटले होते. पण यावेळच्या उमेदवारी अर्जात मात्र त्यांनी आपण केवळ 12 वी उत्तीर्ण आहोत असे म्हटले आहे.