– शाळकरी मुलांनी लिहले पालिका आयुक्तांना पत्र
– एकाच वेळी 901 शाळांमध्ये स्वच्छतेचा जागर
सुनील राऊत
पुणे : शालेय जीवनापासून स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांत जागृती करण्यासाठी महापालिकेकडून आगळा वेगळा उपक्रम शहरातील 901 शाळांमध्ये राबवण्यात आला. त्यात मुलांनी “स्वच्छतेबाबत आपल्याला काय वाटते आणि महापालिकेने काय करावे,’ “स्वच्छतेबाबत तुम्ही कशी जनजागृती कराल’ या विषयावर मुलांना महापालिका आयुक्तांना पत्र पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या उपक्रमानंतर शेकडो पत्रे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे आली आहे.
तिसऱ्या इयत्तेपासून ते दहावीपर्यंतच्या मुलांनी ही पत्रे पाठवली आहेत. ही पत्रे संकलित करण्यासाठी या मुलांनीच तयार केलेल्या पत्र पेट्याही ठेवल्या होत्या. गेल्या तीन महिन्यांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आपली शाळा, शाळेचा परिसरा, घर स्वच्छ ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, रस्त्यावर थुंक़ू नये याबाबत जागृती करण्यात आली. तसेच मुलांना तीन उपक्रम देण्यात आले. त्यात मुलांनी आपली स्वच्छतेची संकल्पना आणि या उपक्रमानंतर काय केले याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र लिहावे, घरी असलेल्या एक लिटर पाण्याच्या बाटलीत सिंगल युज प्लॅस्टिक जमा करून महापालिकेस द्यावे अथवा स्वच्छता उपक्रमाबाबत आपले घरचे व्यक्ती, नातेवाईक तसेच आसपासच्या नागरिकांकडून 12 शब्दांची प्रश्नावली भरून घ्यावी, असे उपक्रम देण्यात आले होते. त्यात बहुतांश मुलांनी आयुक्तांना पत्र पाठवत आपली स्वच्छतेची भूमिका तसेच शाळेतील उपक्रमानंतर आपण काय केले याची माहिती पत्राद्वारे पाठविली आहे.
शहर स्वच्छतेसाठी नागरिकांमध्ये जागृती आवश्यक आहे. मुलांमध्ये शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचा संदेश रुजल्यास भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम होणार आहेत. तसेच मुलांकडून पालकांपर्यंतही हे विषय पोहचवले जात आहेत. त्याला मुलांकडून मिळणारा प्रतिसादही कौतुकास्पद असून शहरातील सर्व शाळांना स्वच्छता उपक्रमांचे वार्षिक कॅलेंडरही देण्यात आले आहे. ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, मनपा.