ना. शंभूराज देसाई; भाजपकडून होणारे आरोप नैराश्यापोटी
सातारा, दि. 1 (प्रतिनिधी)- हिवाळी अधिवेशनात भाजपकडून राज्यातील कायदा व सुव्यस्थेव प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार म्हणून आम्ही त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे वस्तुस्थितीसह खंडन केले आहे. सांगली, सातारा, पुणे ग्रामीण अधीक्षकांवर आ. पडळकर यांनी केलेल्या कारवाईच्या मागणीत व आरोपात तथ्य दिसून येत नसल्याने कोणावरही कारवाई केली जाणार नसल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
विश्रामगृहार सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीची माहिती देताना ते बोलत होते. देसाई म्हणाले, “”महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून हे सरकार पडणार असल्याच्या वल्गना वारंवार करण्यात आल्या.
मात्र, सरकारने करोना काळात जनतेसाठी केलेले काम अन् या परिस्थितीमध्येही केलेली विकासात्मक कामे पाहता सरकार पडणार नसल्याची खात्री झाल्याने आता भाजपकडून वारंवार सरकारवर बेछूट आरोप करून जनमानसांत सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा डाव आखला जात आहे. परंतू, त्यांच्या या नैराश्यातून केल्या जात असलेल्या आरोपांना उत्तरे न देता काम करून दाखवा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे असल्याने त्यांचे आरोप आम्ही गांभीर्याने घेत नाही.” आ. पडळकर यांनी सदनात काही आरोपाबाबत मी सदनातच उत्तर दिले असून त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य दिसून येत नसल्याने कोणावरही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
राणे बत्ताशांवरचे पैलवान?
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत भाजपला यश आल्यानंतर एका वाघाला बॅंकेत जाण्यापासून राणे रोखत असल्याचे चित्र व्हायरल होत असल्याबाबत देसाई यांना विचारले असता, जिल्हा बॅंक निवडणुकीत मतदार मोजके असतात. त्यामुळे छोट्याशा यशाने हुरळून न जाता बत्ताशावर कुस्ती खेळणाऱ्यांनी हिंदकेसरी पैलवानाच्या नादाला लागू नये, असा टोला राणेंचे नाव न घेता लगावला.