जि.प.सदस्य तांबिले; अवसरीत पाणी प्रश्नी शेतकऱ्यांची बैठक
रेडा- उजनी धरणावर हजारो शेतकऱ्यांची शेती अवलंबून असताना धरणाचे पाणीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची उभी पिके जळून चालली आहेत. मात्र, आपण बारमाही पाणीपट्टी भरून देखील आठमाही पाणी मिळत आहे. म्हणून आपल्या सर्व शेतकऱ्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावाच लागणार आहे, असे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील विठ्ठल मंदिरात, माढा व इंदापूर तालुक्यातील दहा गावांतील शेतकऱ्यांच्या विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तांबिले बोलत होते. तांबिले म्हणाले की, भाटनिमगाव बंधाऱ्यातून खाली पाणीपुरवठा करणाऱ्या तीन संस्थाना 1987 पासून कायम बारमाही पाणी पुरवठा करण्याच आदेश शासनाने दिले होते. त्यामध्ये अवसरी, वडापुरी, सुरवड या संस्था 10 वर्षे सुरळीत चालू होत्या; त्यानंतर 2003 मध्ये उजनी धरण कोरडे पडल्यामुळे, पुढे या तीन संस्थाना आठमाही पाणी देण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, नंतर संस्था मोडकळीस आल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याने शेतकरी न्यायालयीन लढा देणार आहेत. बारमाही पाणी पट्टी भरून देखील शेतकऱ्यांच्या आठमाही पाणी मिळत आहे. भाटनिमगाव बंधाऱ्याची उंची पूर्व पश्चिम उंची वाढवून पाणीसाठा जास्त प्रमाणात होण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.
अवसरी पाणी पुरवठा अधिकारी आवटे म्हणाले की, अवसरीचा बंधाऱ्यात पाणी जागेवर झिरपते म्हणून पाणी साठवू शकत नाही, शासनाने बाराही महिने पाणी पुरवठा करणार म्हणून सांगितले होते. मात्र, सध्या आठ महिन्यातच पाणी दिले आहे. उर्वरित चार महिने पाणी कोठून आणायचे? असा सवाल शेतकरी करीत आहेत. अवसरीला पाणी नसल्यामुळे दहा गावांतील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील गाळ काढून त्यावर एकसमान कॉंक्रीटीकरण करणे आवश्यक आहे.
तोबरे आण्णा म्हणाले की, सार्वजनिक सहकारी संस्था 1989 मध्ये चालू झाल्या. मात्र, सध्या त्यांची अवस्था गंभीर आहे. उचल पाणीपुरवठ्याला डबल पाणीपट्टी भरतो आणि विद्युत वितरण कंपनीला केवळ 35 पैसे आकाराने पैसे द्यावे लागायचे. मात्र, सध्या 1 रुपया 68 पैसे आकाराने पैसे द्यावे लागत आहे. 1989 पासून पाणी मिळते; मात्र, सध्या बिलामध्ये प्रचंड तफावत असल्याने आपल्याला न्यायालयात गेल्याशिवाय पर्याय नाही.2000 ापासून धरणाचे पाणी मिळणे कमी झाले, त्यानंतर 2003ला धरण पूर्णपणे कोरडे पडले, 2004ला संपूर्ण क्षमतेने धरण भरले. मात्र, पाणी कपात केलेली योजना तशीच ठेवली म्हणून अवरीच्या बंधाऱ्याला पाणी मिळाले नाही. शासनाने अवसरीच्या बंधाऱ्यात दोन मीटर पाणी देण्याचे ठरवले आहे. मात्र, बंधारा उथळ स्वरूपाचा असल्याने, दीड मीटर पाणी झिरपत असल्याने, केवळ अर्धा मीटर पाणी मिळते त्यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याचे ज्येष्ठ नागरिक मगर यांनी सांगितले.