हर्षवर्धन पाटील यांचे गावकऱ्यांना आश्वासन
नीरा नरसिंहपूर- इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील गिरवी, ओझरे, लुमेवाडी येथील बंधाऱ्यांचे पुराच्या पाण्याने नुकसान व पडझड झालेली आहे. या सर्व बंधाऱ्यांची विलंब न लावता तातडीने दुरूस्ती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.नीरा नदीवरील गिरवी बंधाऱ्यांची पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. पुराच्या पाण्याने बंधाऱ्याची मातीची एक बाजू वाहून गेली आहे. त्यामुळे नागरिकांचे बंधाऱ्यांवरून होणारे दळणवळण बंद पडले आहे. यावेळी पाटील यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी व जलसंपदाचे उपअभियंता कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
नीरा नदीवरील सर्व बंधाऱ्यांची तातडीने दुरूस्ती करावी, असे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. नीरा नदीवरील गिरवी व इतर अनेक बंधारे नादुरुस्त झाल्याने पाण्याअभावी शेतीचे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी पाटील यांना सांगितले. यावेळी इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, उदयसिंह पाटील, संजय बोडके, शंकरराव घोगरे, महादेव घाडगे, ज्ञानदेव क्षीरसागर, सरपंच रेखा कोरे, विद्या क्षीरसागर, पोपट कोरे, शंकर क्षीरसागर, शिवाजी क्षीरसागर, मारूती क्षीरसागर, रामलिंग जगताप, विजय क्षीरसागर व कार्यकर्ते उपस्थित होते.