पूरग्रस्तांना ठेवले धोकादायक इमारतीत
नीरा- येथील पूरपरिस्थीतीमुळे विस्थापीत झालेल्या डोंबारीवस्तीतील लोकांची भेट घेत राज्यमंत्री विजय शिवतारे व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी विचारपूस केली. पूरग्रस्त भागातील लोकांना प्राथमिक शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित केल्याबद्दल संजय जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच भाटघर गुंजवणी व नीरा देवघर या धरणातून आलेल्या पाण्यामुळे वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नीरा येथील वॉर्ड नंबर एकमधील गोपाळ वस्तीतील लोकांची घरे पाण्याखाली गेली होती. या लोकांना ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या वतीने येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले आहे. याठिकाणी त्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापूर्वी पुरंदरचे प्रांत, तहसीलदार व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांनी त्या लोकांची भेट घेऊन पाहणी केली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. शनिवारी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या लोकांच्या निवासस्थानाला भेट देऊन त्यांची विचारपूस केली. रविवारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्याचबरोबर ज्या भागात या पूरग्रस्तांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे. त्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. तिथे त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला. ज्या शाळेत पूरग्रस्तांना निवारा देऊन ठेवण्यात आले आहे. ती शाळा मोडकळीस आल्याने गेल्या वर्षापासून येथील शाळा दुसरीकडे भरत आहे. अशा वेळी या लोकांना येथे ठेवून प्रशासन त्यांच्या जीवाशी खेळत आहे का? असा सवाल संजय जगताप यांनी केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी सरपंच राजेश काकडे, चंद्रकांत धायगुडे, माजी उपसरपंच कल्याण जेधे, नंदू जगताप, जावेद शेख मान्यवरांसह नीरेतील नागरिक उपस्थित होते.