वाहतूक खोळंबली : नागरिक भयभीत
नीरा नरसिंहपूर- नीरा नदीवर बंधारे व बंधाऱ्यालगतचा भाग खचलेला आहे. यासाठी राज्य शासनाने तातडीने निधी देऊन काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. हा मार्ग दळणवळणासाठी दुरुस्त करावा, यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहे. नीरा नरसिंहपूर परिसरातील गिरवी, गणेशवाडी, लुमेवाडी, माळीनगर, सराटी या गावांतील नागरिकांना अकलूज ही बाजारपेठ आहे. या गावांमधील नागरिक अकलूज बाजारपेठेत जातात. परिसरातील गावांचे दळणवळण अकलूज भागामध्येच असते.
अकलूजला जाण्यासाठी मार्ग खचला आहे. त्यामुळे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी पाहणी केली आहे. परंतु या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही. प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. बंधाऱ्याचा भाग खचला असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे.