प्राथमिक शाळेत शुकशुकाट : बेमुदत बंदवर पालक ठाम
नीरा- येथील प्राथमिक शाळेच्या तात्पुरत्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत शाळेत मुले न ठवण्याच्या निर्णयावर पालक ठाम असल्याने गुरुवारी (दि. 1) शाळेत शुकशुकाट पहिला मिळाला. शाळा न.1 व शाळा.न.2 च्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारून जिल्हा परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईचा निषेध केला.
नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक शाळेला इमारत नसल्याने व जिल्हा परिषदेने तात्पुरत्या खोल्यांसाठी 33 लाख रुपयांचा निधी देऊनही केवळ जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत सुस्तपणे झोपी गेलेल्या जिल्हा व ग्रामपंचायत प्रशासनाला जाग यावी म्हणून अनेकवेळा आंदोलने केली; मात्र लेखी आश्वासनाने बोळवण करण्यात आली. या नंतरही कोणतीच प्रगती होत नसल्याने येथील शाळा व्यवस्थापनाने तात्पुरते शेड बांधून होत नाही तोपर्यंत किंवा त्याच्या कामाची सुरवात होत नाही. तोपर्यंत शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. त्यामुळे 550 विद्यार्थी असलेली ही शाळा गुरुवारी बंद ठेवण्यात आली.
दरम्यान, केंद्रप्रमुख सुरेश लांघी यांनी भेट देऊन व्यवस्थापन कमिटी व पालकांशी चर्चा केली. मात्र, पालकांचा रुद्रावतार पाहून त्यांनी काढता पाय घेणे पसंत केले. यावेळी त्यांनी पालकांनाच तुम्ही जागा द्या, आम्ही तिथे खोल्या बांधतो असे म्हणाताच पालकांचा संताप आणखीनच वाढवला. आमच्याकडे एवढी जागा देण्याची ऐपत असती, तर मग एवढ्या अडचणीत आम्ही मुलांना शाळेत पाठवले असते का ? असा सवाल पालकांनी केला आहे. यानंतर लांघी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन कुठे जागा मिळते का? याची चाचपणी केली. नीरेतील मार्केट कमिटीत असलेली मोकळी जागा ते पाहून आले. त्यांच्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण व ग्रामसेवक सुभास निंबरकर हे देखील होते.
- आज आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
नीरा शाळेच्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी पंचायत समिती सभापती उपसभापती व अन्य अधिकारी सोमवारी (दि. 5) नीरेत बैठकीसाठी येत असल्याचे पत्र पंचायत समितीने दिले आहे. मात्र, जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत शाळा बंद राहील, असे पालकांनी सांगितले आहे. शुक्रवारी (दि. 2) सकाळी 11 वाजता याबाबत चर्चा करून या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीत पालकांची बैठक आयोजित केली. असल्याची माहिती व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी दिली आहे. - नीरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी तात्पुरत्या खोल्या रयत संकुलात बांधण्यासाठी जागेची मागणी केल्याचे पत्र अद्याप मला मिळाले नाही. शिक्षण विभागाने अशा प्रकारची मागणी केल्यास दोन महिन्यांनी होणाऱ्या जनरल बॉडीच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा करून संस्थेला किंवा स्थानिकांना कोणत्या अडचणी येतील का? याबात त्यांचा अभिप्राय मागवून याबाबत विचार करू; मात्र अद्याप तरी असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही.
अनिल पाटील, अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था - एका बाजूला शासन प्राथमिक शिक्षण सक्तीचे म्हणते. त्यासाठी तसा कायदा करते .इथे मात्र शासनच आमच्या विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित ठेवते आहे. गेली तीन वर्ष मोडकळीस आलेल्या इमारतीत आमची मुले जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. आता रयत संकुलामध्ये बसण्याची व्यवस्था केली असली तरी एका वर्गात तीन-तीन वर्गांची मुले दाटी वाटीत बसवली जात असल्याने मुलांना अगदी जनावरांसारखी वागणूक मिळत आहे. याला जिल्हा परिषद प्रशासनच जबाबदार आहे. त्यांच्यावर कठोर करवाई व्हायला हवी. बांधकामासाठी केवळ लाखो रुपये मंजूर करून उपयोग नाही, तर त्याचा विनियोग व्हायला हवा.
जयश्री शिंदे, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन कमिटी नं.2