नीरा – पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या वीर धरणातून पुढील 24 तासांत केव्हाही नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडले जावू शकते. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये मागील चार-पाच दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे चारही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असल्याने वीर धरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याचे उपअभियंता विजय नलवडे यांनी सांगितले.
वीर 10 टीएमसी सावठ क्षणमतेचे धरण आहे. शनिवारी (दि. 8) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणामध्ये 8.20 टीएमसी साठा म्हणजेच 84.53 टक्के पाणीसाठा आहे. धरण साखळीमध्ये काही प्रमाणात आज दुपारनंतर पाऊस झाला. त्यामुळे पुढील चोवीस तासात केंव्हाही वीर धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहे. त्यामुळे नीरा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील असणाऱ्या शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी सावधानता बाळगावी, असे आवाहनन प्रशासनाच्या वतीने संध्याकाळी दवंडीद्वारे करण्यात आले.