निमसाखर – जलसंपदा विभागाच्या नीरा डाव्या कालव्यावरील 54 फाटा लाभक्षेत्रामधील निमसाखर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाण्याची गरज भासत आहे. जलसंपदा विभागाकडून उन्हाळी आर्वतनाला अद्यापही एक आठवडा लागणार असल्याने अनेक उन्हाळी पीके जळून जाणचा धोका आहे.
नीरा डाव्या कालव्याच्या 54 फाटा अंतर्गत निमसाखर बरोबरच घोरपडवाडी, हगारवाडी, शिरसटवाडीसह काही भाग ओलीताखाली येतो. सध्या, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कडवळ, मका, ऊस पिकासह डाळिंब, द्राक्षे, चिकू, पेरु, शेवगा व आंबा यासह अन्य फळबागा परिसरात पहावयास मिळतात. या परिसरात 42 अंश सेल्सिअसपर्यंत तपमान जात असून दुपारच्यावेळी वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना व फळबागांना मोठा फटका बसत आहे. शेतातील बोअरवेल आणी विहीरी पूर्ण आटल्याने परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याच बरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे जलसंपदा विभागाने उन्हाळी आवर्तन देत असताना योग्य नियोजन करुन पाण्याची चोरी थांबविण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
सध्या, शेतकऱ्यांनी घेतलेल्या चारा पिकांची व ऊस पिके अनेक ठिकाणी जळालेले विदारक चित्र आहे. आणखी काही दिवस उन्हाळी आवर्तनाला एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे या भागातील मोठे क्षेत्रावरील शेती पिके जळणार आहे. यामुळे जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करीत अवैध सायपन धारकांवर कारवाई करावी. यामुळे 54 फाट्याजवळ निघणारे गेज टेलच्या शेतकऱ्यांपर्यंत बऱ्यापैकी लागेल आणि वेळेत आवर्तन पोहाचेल. याच बरोबर खात्याने फाटा सुटल्यानंतर सुरुवातील पिण्याचे तलाव भरुन घ्यावेत, अशी मागणीही या भागातील नागरीकांतून केली जात आहे.