नगर -महापालिका लाखो रुपये खर्च करुन रस्त्यांची कामे करवून घेते. मात्र, अलिकडे काही वर्षांत या रस्त्यांवरील खर्च अवघ्या काही दिवसांत पाण्यात गेल्याचे समोर येते. त्यामुळे भविष्यात निकृष्ट दर्जाची कामे केल्यास त्या ठेकेदारांची बिले अडविण्यात येतील, असा इशारा महापालिका विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी दिला.
नागापूर फाटा ते गणेश चौकापर्यंतच्या रस्त्याची आज दुरुस्ती सुरू करण्यात आली. त्याची पाहणी विरोधी पक्षनेते बारस्कर यांनी केली. महापालिका शहर अभियंता सुरेश इथापे यांनी त्यांना रस्त्याच्या कामाची माहिती दिली. अभियंता मनोज पारखे, अमोल लगड व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दोन वर्षापूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी निधी उपलब्ध दिला. तथापि, महापालिका अधिकाऱ्यांनी त्या वेळी कामावर योग्य लक्ष्य न दिल्याने त्या रस्त्याच्या दुरुस्तीची वेळ आली असल्याचे बारस्कर म्हणाले. याच रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात मी तक्रारही केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत महापालिका प्रशासनाने पुन्हा त्याच ठेकेदाराला रस्त्याचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दर्जेदार काम न झाल्यास त्या ठेकेदाराला महापालिकेतून बिल मिळू देणार नाही, असा इशाराही बारस्कर यांनी दिला.