मुंबई : कागदाच्या वापरापासून डिजिटल व्यवहारांकडे होणारा बदल कृत्रिम बुद्धीमत्तेचा तसेच मशीनचा वापर आणि मनुष्यबळाची कमतरता अशी आव्हाने आज एनएसओ म्हणजेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयासमोर आहेत आणि या आव्हानांवर मात करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार टोपरानी यांनी दिली. या विभागाच्या प्रादेशिक शिबिराचे आज नवी मुंबईतल्या बेलापूर कार्यालयात उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या विभागामार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातल्या कंपन्यांकडून मनुष्यबळाची आकडेवारी आणि माहिती संकलित केली जाते. या संकलित माहितीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी होतो. यासाठी सांख्यिकी विभाग विविध क्षेत्रांकडून वैयक्तिक तसेच कंपन्यांचे आकडे मागवत असते. आता उबेर आणि ओला अशा टॅक्सी सेवांकडूनही सरकार ही आकडेवारी घेईल असे टोपरानी यांनी सांगितले. सरकारची धोरणे आणि योजना निश्चित करण्यासाठी अशा सर्वेक्षणांची अत्यंत आवश्यकता असते. अचूक सर्वेक्षणातून सरकारला योग्य धोरण ठरवता येते.