नवी दिल्ली : लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजुरीसाठी मांडले जात असतानाच त्याबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र 964 शास्त्रज्ञ आणि बुध्दीवंतांनी सरकारला पाठवले आहे.
या पत्रावर देश विदेशातील नामवंत शिक्षण संस्थामधील कार्यरत असणाऱ्या विद्वानांच्या स्वाक्षरी आहेत. हार्वड विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, शिकागो विद्यापीठ, आयआयटी कानपूर, सेंट्रल मिशिगन विद्यापीठ, आयआयटी हैदराबाद, सिटी कॉलेज न्युयॉर्क, आयआयटी मद्रास अशा संस्थांमधील हे बुध्दीवंत आहेत.
या विधेयकामुळे धर्म हा भारतीय नागरिकत्वाचा निकष बनेल. त्यामुळे मोठा गोंधळ उडेल. अर्थात हे मत दैनिकांत छापून आलेल्या बातम्यांवर आधारित आहे. आम्हाला या विधेयकाचा मूळ मसुदा मिळालेला नाही, असे या मान्यवरांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
नागरिकत्वातून मुस्लिमांना वगळणे देशाच्या बहुविध चौकटीला धोकादायक ठरू शकते. धार्मिक स्वरूपावर नागरिकत्व ही घटनेच्या चौकटीबाहेरची कृती असल्याने हे विधेयक तातडीने मागे घ्यावे, असे त्यात म्हटले आहे.