पळसदेव- पळसदेव भागात धुमाळीच्या पुलालगतच धोकादायक स्थितीत रोहित्र बसवले आहेत. हे रोहित्र धुमाळीच्या पुलाला लागूनच बसवण्यात आले आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट झाल्यास शॉक लागून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंदापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलालगत रोहित्र तर उजनी धरणाची पाणी पातळी वाढल्याने एक ते दीड फूट पाण्यात गेले आहेत. तरी रोहित्रमधून विद्युत पुरवठा नियमित सुरळीत आहे. याच भागात शेतकऱ्यांनी केबलला जोडून सोडून दिले आहेत. जॉईटभोवती चिकट टेप देखील लावण्याची तसदी शेतकऱ्यांनी घेतली नाही. सूरज काळे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दि. 13 रोजी तहसिलदार यांनी आदेश देऊनही महावितरण व नॅशनल हायवे अथॉरिटी यांचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.
महावितरण व नॅशनल हायवे अथॉरिटी यांनी इंदापूर तहसीलदारांच्या आदेशाला धुडकावून सुनावणीला गैरहजर राहिले. यावरून अधिकाऱ्यांना सोयरसूतक नसल्याची बाब समोर आली आहे. पुन्हा तहसीलदार मेटकरी यांनी महावितरणच्या सहायक अभियंत्यांना रोहित्र बसवल्याची परवानगीबाबतचे सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.