विश्रांतवाडी : करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित करून देखील नागरिक घरातून बाहेर पडताना दिसत आहे. यामुळे या रोगाचा संसर्ग रोखण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विश्रांतवाडी व धानोरी परिसरातील सर्व दुकाने बुधवार ते शुक्रवार (दि.८,९,१० एप्रिल) दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत.
लॉकडाऊन असताना देखील धानोरी परिसरातील नागरिक खरेदी करण्याच्या बहाणा करून वारंवार घराबाहेर पडत आहेत. मुख्य रस्ता वगळता अंतर्गत रस्त्यावरील चौकाचौकात नागरिक घोळका करून गप्प्पा मारताना दिसून येतात. त्यामुळे सर्वत्र गर्दी होत असून, सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. या पार्श्वभूमीवर तीन दिवस मेडिकल व दवाखाने वगळता सर्व किरणा मालाची दुकाने, दुध डेअरी, चिकन, मटन, भाजीपाल्याची दुकाने देखील स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधी, विश्रांतवाडी पोलीस प्रशासन, व्यापारी संघटना व नागरिकांनी घेतला आहे.
पुढील तीन दिवस धानोरीतील भैरवनगर, मुंजाबावस्ती, आनंदपार्क, गोकुळनगर, धानोरी जकातनाका, कलवड, खेसेपार्क, विश्रांतवाडी, कळस, म्हस्के वस्ती व आजूबाजूचा परिसर बंद राहणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत बाहेर रस्त्यावर दिसणाऱ्यावर पोलीस प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे.