थेट ग्राहकांना विक्री ः बारामतीच्या काटेवाडीतील शेतकऱ्याचा प्रयोग
भवानीनगर -शेतकऱ्यांनी शेतात नियोजनबद्ध पद्धतीने पिक घेतले तर शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिकदृष्ट्या फायदा होतोच… त्याचेच उदाहरण म्हणजे काटेवाडी (ता. बारामती) येथील कुमार काटे यांनी माणिकचमन जातीच्या द्राक्ष पिकातून 15 लाख रुपये उत्पन्न घेतले आहे, अशी माहिती ऍड. रोहित काटे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील शेतकरी हे राज्यात द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहेत. या गावातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर द्राक्ष बागा आहेत. या द्राक्ष बागांतून लाखो रुपये उत्पन्न शेतकरी घेत आहेत.काही शेतकरी हे परदेशात ही द्राक्ष निर्यात करीत आहेत. त्यामुळे बोरी या गावातील शेतकऱ्यांचे नाव द्राक्ष उत्पादनात अग्रक्रमाने घेतले जाते. काटेवाडी येथील कुमार काटे यांनीही इतर शेतकऱ्यांप्रमाणे द्राक्ष बाग लावली. कुमार काटे यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदा द्राक्ष बागेचे पहिले उत्पन्न घेतले. पहिले पिक असल्याने 17 ते 18 टन द्राक्ष त्यांनी जागेवरच वजन काटा ठेवून रस्त्याने जाणाऱ्या ग्राहकांना विकली. त्यात त्यांना 9 लाखांचे उत्पन्न मिळाले. काटे यांचे शेत हे बारामती – इंदापूर रस्त्याच्या कडेला काटेवाडी गावाजवळ असल्याने त्यांनी थेट रस्त्याच्या कडेला मंडप टाकून जागेवरच द्राक्ष विकण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला. द्राक्ष चांगल्या प्रकारची व गोड असल्याने ग्राहकांनीही या द्राक्ष खरेदीस पसंती देत गर्दी करण्यास सुरुवात केली.
ही गर्दी वाढतच गेल्याने द्राक्ष जागेवरच विकण्याचा निर्णय याही वर्षी कुमार काटे यांनी घेतला. याही वर्षी मंडप टाकून द्राक्ष विकण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 1100 किलो द्राक्ष जागेवरच ग्राहकांनी खरेदी केली. तर सध्या रोज साधारण 1300 ते 1400 किलो द्राक्ष ग्राहक खरेदी करीत आहेत; परंतु सध्या वातावरणातील बदलामुळे व जास्तीचा वेळ जाऊ नये द्राक्ष बागेचे नुकसान होऊ नये म्हणून काही द्राक्ष व्यापाऱ्यांना 40 ते 42 किलो रुपयांने द्राक्षे विकली आहेत. नीरा डावा कालवा या भागातून गेल्याने व कालव्याखालील भाग हा बागायती असल्याने या भागात उसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. ऊस शेतात साधारण 18 महिने राहतो व तो ऊस कारखान्यास तुटून गेल्यावर एकरी उत्पन्न ऊस जर चांगला सांभाळला तर साधारण दीड लाखांपर्यंत मिळते. या उसाच्या पिकात जास्त प्रमाणात फायदा होत नसल्यानेच कुमार काटे यांनी उसाबरोबर द्राक्ष पिक घेण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या या प्रयत्नाला मोठे यश मिळाले.
दोन एकर द्राक्ष बागेत साधारण 34 टन द्राक्ष उत्पादन मिळाल्याने व जागेवरच ग्राहकांनी खरेदी करत असल्याने काटे यांना या दोन एकर द्राक्ष पिकात तब्बल 15 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. शेती करणे एवढे सोपे काम नाही हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे; परंतु मनापासून उत्तमरीत्या नियोजन करून वेगवेगळी पिके घेतली तर शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक फायदा होतो.
- बागेतून एवढे उत्पन्न काढून द्राक्ष रस्त्याच्या कडेला जागेवरच विकली जात आहेत. ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहून शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सुनंदा पवार यांनीही आवर्जून वेळ काढत द्राक्ष विक्रीच्या ठिकाणी भेट देऊन द्राक्षाची चव चाखली. द्राक्षाच्या घडांचे वजन करून पाहिले त्यांनीही काटे यांचे कौतुक केले.
काटेवाडी (ता. इंदापूर) ःयेथील शेतकरी कुमार काटे यांनी