दौंड- मागील आठवड्यात भीमा नदीला आलेल्या पुरामुळे दौंड शहरातील पानसरे वस्ती, खाटिक गल्ली,वडार गल्ली आणि नदीकाठच्या घरांना पुराचा फटका बसला होता. यामध्ये जवळपास साडेचारशे कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली होती. या पूरग्रस्त भागाची पाहणी आज (दि. 11) बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आणि येथील पूरग्रस्तांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
यावेळी या पूरग्रस्तांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने प्रत्येक कुटुंबास पाच किलो तांदूळ व ब्लॅंकेट्स वाटप करण्यात आले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून, सर्व राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरून या पुरग्रस्तांना मदत करावी. मात्र, मंत्री गिरीश महाजन हे पूरस्थितीची पाहणी करण्याकरता गेल्यावर पूरग्रस्तांची विचारपूस करण्याऐवजी सेल्फी काढण्यात मग्न असल्याची टीका करत हे सरकार संवेदनशील नसल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, पंचायत समितीचे सभापती ताराबाई देवकाते, महसूल नायब तहसीलदार स्वाती नरोटे, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, दौंड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.