– संदीप घिसे
पिंपरी – पती आणि पत्नीमधील भांडणाला काहीही कारण चालते, असे नेहमी आपण ऐकत आलो आहोत. मात्र शहरातील एका दांपत्याला झालेले दुसरे अपत्य हे त्यांच्यातील भांडणाला कारण ठरले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की पती आणि पत्नी विभक्त राहू लागले. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद संसारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला. मात्र वेळीच पोलिसांनी केलेला हस्तक्षेप आणि सुमपदेशनानंतर त्यांच्यातील सुखाचा संसार पुन्हा सुरू झाला.
नयना आणि पराग या दोघांची ओळख एका कार्यक्रमात झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे कळलेच नाही. त्या दोघांचाही धर्म वेगळा होता. मात्र प्रेमापुढे त्यांनी धर्माचाही विचार केला नाही आणि लग्नबंधनात त्यांनी स्वतःला अडकवून घेतले. त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. त्यांच्या संसारवेलीवर मुलीच्या रूपाने एक फुल उमललं. यामुळे नयना आणि पराग हे दोघेही खूश होते. मुलीच्या संगोपणात आणि तिच्याशी खेळण्यात त्या दोघांचा वेळ जाऊ लागला. त्यानंतर आपल्या मुलीचा एखादा भाऊ किंवा बहिण असावी, अशी अपेक्षा नयना हिने आपल्या पतीशी बोलताना व्यक्त केली. मात्र परागचा याला विरोध होता. आपण एकाच मुलीला चांगले शिक्षण देऊन मोठे करू. आपल्या पगारात दोन्ही मुलांचे पालन पोषण आणि त्यांचे दर्जेदार शिक्षण होणार नाही, असे पराग याने सांगितले. मात्र दोघेही आपल्या मतावर ठाम होते.
पराग आणि नयना यांची मुलगी मोठी होत होती. अशाचत नयना हिला पुन्हा दिवस गेले. ही बाब तिने परागपासून लपवून ठेवलली. तीन-चार महिन्यानंतर नयना हिने आपल्या घरात नविन पाहूणा येणार असल्याचे परागला सांगितले. तिला वाटले पराग ही गोष्ट ऐकून खूश होईल. मात्र झाले उलटेच. दुसऱ्या अपत्याच्या आगमनावरून त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पराग घरातून निघून गेला.
जिल्ह्यातील एका तालुक्याच्या शहरात जाऊन नोकरी करू लागला. इकडे नयना हिला मुलगा झाला. नयनाला वाटले मुलगा झालेला एकून पराग धावत येईल. मात्र ही माहिती मिळूनही सहा महिने पराग मुलाला पहायला आला नाही. त्यानंतर तो आला तरी फक्त मुलीचेच लाड करायचा. तिला कपडे किंवा इतर गोष्टी खरेदी करून द्यायचा. मात्र नयना आणि मुलाकडे दुर्लक्ष करायचा. कित्येक महिने हा प्रकार सुरू होता. अखेर नयना हिने पोलिसांच्या महिला सहाय्यक कक्षाकडे धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला.
पोलीस उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांनी नयना आणि पराग यांना समुपदेशासाठी बोलावून घेण्याची सूचना पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड आणि अनिता जाधव यांना केली. ठरलेल्या दिवशी ते दोघेही समुपदेशासाठी आले. समुपदेशक वंदना जगताप यांनी त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या. संसार करताना एकमेकांच्या भावना जाणून त्यांचा आदर करायला हवा. कोणताही निर्णय घेताना एकमेकांशी चर्चा करूनच घ्यावा, असेही दोघांना समजून सांगितले. त्यांनी पराग याच्या मनात दुसऱ्या अपत्याविषयीची रागाची भावना दूर केली. नयना यांनीही आपण नोकरी करून संसाराला हातभार लावण्याची तयारी दर्शविली. यामुळे आता ते दोघेही पुन्हा सुखाने संसार करू लागले आहेत.