जुन्नर-पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळ निवारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरिता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी येणाऱ्या तक्रारींकरिता स्वतंत्रपणे नोंद घेण्यात येऊन चारा छावणी, पाणी टंचाई व त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये टॅंकरची मागणी आल्यास 24 तासात मंजुरी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 6 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चारा छावण्यांच्या नवीन प्रस्तावांना 24 तासांतच मंजुरी देण्यात येऊन त्याची कार्यवाही करण्यात येत आहे. चाऱ्याच्या उपलब्धेकरिता मे 2019 पर्यंत नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभागाकडील चारा पिकाखाली, पशुसंवर्धन विभागाकडील कामधेनु दत्तक ग्राम योजना, वैरण विकास योजना, जिल्हा परिषद सेस अंतर्गत, उसाच्या वाढ्यांपासून, आत्मा आणि टीएससी/केव्हीके, जलाशय, तलावाखालील गाळपेरापासून, कृषि विभागाकडून उन्हाळी हंगाम अशा एकूण दोन लाख हेक्टर क्षेत्रापासून एकूण 14 लाख टन तर उसापासून उपलब्ध होणारा चारा (व्होल) 13 लाख टन अशा एकूण 27 लाख टन चाऱ्याचे नियोजन मे 2019 अखेर करण्यात आलेले आहे. याकरिता पुरेसा निधी उपलब्ध झालेला आहे.दुष्काळ निवारण, टॅंकर मागणी, चारा छावणी तसेच आपत्ती व्यवस्थापन इ. विषयांकरीता नागरिकांनी त्यांच्या तक्रार किंवा सूचनांकरिता 1077 या टोल फ्री व 020- 26123371 या संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवाहन केले आहे.